लोकप्रिय न्यूज नेटवर्क
अशोक पाटील तेलंग
नांदेड : शेतकरी व ग्राहक यांना थेट जोडण्याच्या उद्देशाने नांदेड जिल्ह्यात “जिल्हा कृषी व धान्य महोत्सव २०२६” आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होणार असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे.
“शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी” या संकल्पनेवर आधारित या महोत्सवामध्ये विविध कृषी उत्पादनांचे प्रदर्शन, थेट विक्री तसेच शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेतमाल उत्पादकांना ग्राहकांपर्यंत थेट विक्रीची संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
हा महोत्सव दि. १५, १६ व १७ मार्च २०२६ दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान, नवा मोंढा, नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात धान्य, कडधान्ये, तेलबिया, फळे-भाज्या तसेच विविध कृषी उत्पादनांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.
या उपक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व प्रकल्प संचालक आत्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील शेतकरी, शेतमाल उत्पादक गट तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

إرسال تعليق